बारामतीः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या घरी लवकरच मुलाच्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार आहेत. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचे लग्न निश्चित झाले आहे. बारामतीचा हा लेक आता फलटणचा जावई होणार असून येत्या १० एप्रिलला जय पवार आणि ऋतुजा यांचा साखरपुडा आहे.

दरम्यान जय आणि ऋतुजा यांनी पवार कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ आणि नात्याने आजोबा असलेल्या शरद पवारांची भेट घेतली आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनीही जय आणि ऋतुजा यांचे फोटो सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्ट मुळेच जय आणि ऋतुजाच्या लग्नाची माहिती समोर आली आहे. जय आणि ऋतुजा यांनी पुण्यातील शरद पवारांच्या निवासस्थानी जात आजोबा आणि आजी प्रतिभा पवार यांची भेट घेतली.जय पवार हे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव आहेत.

त्यांचा विवाह ऋतुजा पाटील यांच्याशी होणार आहे. ऋतुजा या फलटण येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत. प्रवीण पाटील हे सोशल मीडिया कंपनी सांभाळतात. ऋतुजा या उच्चशिक्षित असून जय आणि दोघांमध्ये मागील काही वर्षांपासून ओळख होती.जय पवार यांनी पार पडलेल्या विधानसभेला बारामती मतदारसंघातील प्रचाराची धुरा सांभाळली होती. गावोगावी दौरे करत त्यांनी वडिलांचा प्रचार केला होता. जय पवार यांनी दुबईत काही काळ व्यवसाय सांभाळल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाच्या बैठकीला, प्रचाराला त्यांनी हजेरी लावली होती.
