फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन नुकसान शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते नुकसानीचे पंचनामे होतील व भरपाई मिळेल या आशेत फलटण तालुक्यातील शेतकरी वाट पाहत होता परंतु भरपाईसाठी पंचनामे करण्यासाठी तलाठी व मंडलाधिकारी तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे बांधावर पोहचले नाहीत शेतकऱ्यांनी याबाबत गावातील तलाठ्यांशी संपर्क साधला असता पंचनामे पूर्ण झालेत असे उत्तर मिळाल्याने खरा नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार आहे.
फलटण तालुक्यातील अनेक बाधित गावात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भेट देऊन पाहणी करण्यासाठी अनेकांची चढा ओढ लागली होती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार सचिन पाटील, माझी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव यांनी अनेक गावात जाऊन पाहणी करून नुकसानीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून भरपाई देण्याची हमी दिली होती.
गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रात मान्सून पूर्वी असा पाऊस कधी झाला नसून असा प्रथमच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात घरांची पूर्णत: पडझड व शेतपीकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले होते एकीकडे प्रशासनाकडून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत होते व राहिलेले पंचनामे पूर्ण करण्याचे युध्दपातळीवर काम सुरु असल्याचे सांगण्यात येत होते परंतु प्रत्यक्षात खऱ्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर कोणताच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी पंचनामा करण्यासाठी पोहोचला नसल्याचे चित्र आज सोमवार दिनांक 2 जून रोजी दिसत आहे.
राज्यामध्ये अवकाळी पावसाने मोठे ज्या ज्या ठिकाणी पावसाने नुकसान झाले आहे; अश्या सर्व ठिकाणचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ना. एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले होते पण प्रत्यक्षात हे आदेश पाळण्यात आले नसल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली आहे.
फलटण तालुक्यातील एका गावातील तलाठी यांना पंचनामे न झाल्याने त्यांच्याशी संपर्क केला असता “पंचनामे आम्ही जमा केले आहे आता पंचनामा होणार नाही रिपोर्ट दिला आहे. तुम्ही कळविले नाही तुम्ही कळविले तरच पंचनामा होईल बाकीचे पण कामे आहेत शुक्रवारीच रिपोर्ट दिला आहे” असे सांगण्यात आले.
प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे संकटात सापडला शेतकरी हैराण झाला आहे.महसूल प्रशासनाकडून नुकसानी करता पंचनामा करण्यासाठी कोणाकडे संपर्क करावा, कोण पंचनामे करणार, पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक कोणते, पंचनामा करण्यासाठी लागणारे कागदपत्रे व निकष कोणते, कधी पर्यंत पंचनामे करणार याबाबत अवगत न केल्याने अनेक शेतकरी पंचनामे झाल्यामुळे नुकसान भरपाईस मुकणार असल्याचे चित्र सध्या फलटण तालुक्यात दिसत आहे.