श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याचा १२ लाख टन ऊस गाळप करण्याचा निर्धार

। फलटण प्रतिनिधी । आगामी २०२५-२६ हंगामात श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याने १२ लाख टन ऊस गाळप करण्याचा निर्धार केला असून, त्या अनुषंगाने तोडणी आणि वाहतूक यंत्रणेची करार प्रक्रिया निष्पन्न झाली आहे. कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी श्री दत्त इंडियाच्या ६ व्या मिल रोलर पूजन समारंभात याबाबत माहिती दिली.

गेल्या पाच हंगामांत शेतकऱ्यांना वेळेवर आणि चोख पेमेंट केल्यामुळे यंदाचा गाळप यशस्वी होईल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.फलटण येथील श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत शामसुंदर शास्त्री यांच्या हस्ते श्रीदत्त इंडियाच्या नव्या मिल रोलर बसवण्याचा विद्युत कळ दबावून शुभारंभ झाला. पूजन विधी इंजिनिअरिंग विभागाचे डेप्युटी चीफ इंजिनियर नितीन रणवरे यांनी पार पाडला. अजितराव जगताप म्हणाले की, मागील हंगामापासून कारखान्याची गाळप क्षमता वाढवून दैनंदिन ८,५०० टन ऊस गाळप करण्यास कारखाना सज्ज झाला आहे.

शासन निर्णयांनुसार कारखाना गाळप सुरू करणार असून, गाळप क्षमता वाढल्याने शेतकऱ्यांना ऊस वेळेवर गाळप होण्यास मोठी मदत होणार आहे.अजितराव जगताप यांनी फलटण तालुक्यातील तसेच परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आपला ऊस श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याला गाळपासाठी देण्याचे आवाहन केले. त्यांनी कारखान्याच्या सततच्या चोख पेमेंटमुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढल्याचा उल्लेख केला. या कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक चेतन धारू, चीफ इंजिनिअर अजित कदम, उत्पादनाचे व्हॉइस प्रेसिडेंट भारत तावरे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी रमेश बागनवर, आणि सुरक्षाधिकारी अजय कदम यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, तसेच फलटण तालुका साखर कामगार युनियनचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याने १२ लाख टन ऊस गाळप करण्याचा भक्कम उद्दिष्ट सांगितल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. कारखान्याच्या गाळप प्रक्रिया सुधारण्याबरोबरच तोडणी व वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली आहे. फलटण भागातील शेतकरी या संधीचा पूर्ण फायदा घेण्याकडे लक्ष देत आहेत, ज्यामुळे स्थानिक अर्थकारणास चालना मिळण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!