मुंबई:- आज महायुतीच्या नेत्यांची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र एकनाथ शिंदे हे साताऱ्यात आपल्या गावी गेल्यामुळे बैठक रद्द झाल्याची माहिती मिळत आहे.
काल (दि. २८ नोव्हेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली. त्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या खातेवाटपासंदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र एकनाथ शिंदे हे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेल्याची बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे साताऱ्यासाठी निघाल्यामुळे महायुतीची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे.
अमित शाह यांच्याबरोबर दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर महायुतीचे नेते, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मुंबईत परतले होते. त्यानंतर आज मुंबईत खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दिल्लीतील बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी सूचक व्यक्तव्य केले होते. अमित शाह यांच्याबरोबर अतिशय सकारात्मक बैठक झाल्याचे त्यांनी म्हटले. “मुंबईत भाजपाची बैठक होईल. त्यानंतर पुढील निर्णय होईल. दिल्लीतली आमची बैठक सकारात्मक झाली. अमित शाह, जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. माझी भूमिका मी जाहीर केली आहे. मी शिवसेना म्हणून महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. डेडलॉक संपला आहे. सगळे काही व्यवस्थित आहे. मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, मी सगळ्यांची काळजी घेतो आहे” असे एकनाथ शिंदेंनी म्हटले होते.आज मुंबईत बैठक होईल, अशी माहिती खुद्द एकनाथ शिंदे यांनीच दिली होती, त्यानंतरही ते सातारा येथे जाणार असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.