महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण | प्रतिनिधी
फलटण नगरपरिषदेतील मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता, या प्रकरणी नगरपरिषदेचे सहायक कर निरीक्षक जगदीश भाऊराव माळी यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून नगरपरिषदेतील कर्मचारी प्रदीप अरुण काकडे, शरद माधव अहिवळे आणि नितीन देवदास वाळा यांच्याविरुद्ध फसवणूक, अपहार व संगनमताचे आरोप करण्यात आले असून, एकूण १ लाख ५० हजार रुपयांच्या आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी नितीन देवदास वाळा यास अटक करण्यात आली असून दोन जण फरार आहेत.
पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादीनुसार, फिर्यादी जगदीश माळी फलटण नगरपरिषदेत सहायक कर निरीक्षक म्हणून कार्यरत असून, मालमत्ता कर वसुली, मालमत्तांचे नाव हस्तांतरण, कर्मचाऱ्यांवर देखरेख आदी जबाबदाऱ्या ते सांभाळत आहेत.या प्रकरणाची सुरुवात नागरिकांच्या तक्रारींमधून झाली. ९ जुलै २०२६ रोजी बाळू शंकर वाडेकर आणि मंगल बाळू वाडेकर यांनी प्रदीप काकडे यांनी मार्च २०२६ मध्ये घरपट्टी व पाणीपट्टीपोटी २८ हजार रुपये रोख स्वीकारूनही अधिकृत पावती दिली नसल्याची लेखी तक्रार मुख्याधिकाऱ्यांकडे केली.
त्यानंतर १० जुलै २०२६ रोजी सुनील अमृत जानकर यांनी प्रदीप काकडे यांनी २२ हजार रुपये ऑनलाइन स्वीकारले, मात्र त्याची पावती दिली नसल्याची तक्रार केली. या तक्रारीसोबत ऑनलाइन व्यवहाराचा स्क्रीनशॉटही जोडण्यात आला होता.यानंतर २२ जुलै २०२६ रोजी रुक्मिणी रामदास मंजुळे यांनी मार्च २०२६ मध्ये २४ हजार रुपये रोख दिले असूनही पावती मिळाली नसल्याचे सांगितले. त्याच दिवशी काशीबाई जयराम माने यांनीही मार्च २०२६ मध्ये ४० हजर रुपये रोख भरले असून त्याची पावती न मिळाल्याची लेखी तक्रार नगरपरिषदेकडे केली.
याच काळात अय्याज इकबाल कोतवाल यांनी शरद माधव अहिवळे यांच्याविरोधात २३ मार्च २०२४ रोजी दिलेल्या २० हजार रुपये धनादेशाच्या बदल्यात दुसऱ्याच मिळकतीची पावती देण्यात आल्याचा आरोप केला. तसेच विजय सुरेश मलाणी यांनी १५ मार्च २०२२ रोजी १ लाख ३८ हजार २६२ रुपये धनादेश दिला असताना त्यापैकी १ लाख २१ हजार ८६३ चीच पावती देण्यात आली असून उर्वरित १६ हजार ३९९ रुपयाची पावती न मिळाल्याची तक्रार दाखल केली.
या सर्व तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने संबंधित कर नोंदींची पडताळणी केली. पडताळणीत संबंधित रकमेच्या अधिकृत पावत्या प्रणालीमध्ये नोंद झालेल्या नसल्याचे निदर्शनास आल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली.चौकशीदरम्यान संगणक ऑपरेटर नितीन देवदास वाळा यांचा जबाब नोंदविण्यात आला.
फिर्यादीनुसार, मालमत्तांचे हस्तांतरण, नवीन मिळकतींच्या नोंदी, पुनर्मूल्यांकन तसेच भाडेकरूंच्या नोंदी कमी करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांकडून नागरिकांकडून ५०० रुपये ते १ हजार पर्यंत रक्कम घेतली जात असल्याची बाब समोर आली. तसेच संबंधित माहिती वरिष्ठांच्या निदर्शनास न आणता जाणीवपूर्वक लपविण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
मुख्याधिकारी यांनी केलेल्या चौकशीत प्रदीप अरुण काकडे यांनी १ लाख १४ हजार रुपयांची, तर शरद माधव अहिवळे यांनी ३६ हजार ३९९ रुपये असा एकूण १ लाख ५० हजार ३९९ रुपयांचा कथित अपहार केल्याचे निष्पन्न झाल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. तसेच या प्रकारास नितीन देवदास वाळा यांनी मदत केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या चौकशीनंतर मुख्याधिकारी, फलटण नगरपरिषद यांनी २३ जुलै २०२६ रोजी अधिकृत प्राधिकरण देऊन सहायक कर निरीक्षक जगदीश माळी यांना संबंधितांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्याचे अधिकार दिले. त्यानुसार फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.फिर्यादीनुसार, १५ मार्च २०२२ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत संबंधित तिघांनी मालमत्ता धारकांचा विश्वास संपादन करून घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम स्वीकारली, मात्र अधिकृत पावत्या न देता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्या रकमेचा अपहार केला.
त्यामुळे फलटण नगरपरिषद तसेच संबंधित मालमत्ता धारकांची एकूण १ लाख ५० हजार ३९९ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास फलटण शहर पोलीस करीत आहेत.याप्रकरणी नितीन देवदास वाळा यास अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली असून प्रदीप अरुण काकडे, शरद माधव अहिवळे हे दोन जण फरार आहेत.
फसवणूक झालेल्या महिला नागरिकांनी महाराष्ट्र माझा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, फलटण पालिकेचा निलंबित लिपिक प्रदीप अरुण काकडे याने फरार होण्यापूर्वी निलंबित असताना आमच्याकडे आले त्यांनी पालिकेचा कर आजच भरा अन्यथा कारवाई होईल असे सांगत अनेक नागरिकांची नव्याने फसवणूक केली असून यामध्ये मंगल बाळू वाडेकर यांच्याकडून २८ हजार रुपये, काशीबाई जयराम माने यांच्याकडून ४० हजार रुपये, रुक्मिणी रामदास मंजुळे यांच्याकडून २४ हजार रुपये , सुमन तुकाराम लष्कर यांच्याकडून २८ हजार रुपये, शोभा नामदेव लष्कर यांच्याकडून ४० हजार रुपये, तानाजी विठोबा धोत्रे ३० हजार रुपये, शिवाजी विठोबा धोत्रे १५ हजार रुपये वरील सर्वांकडून पैसे वसूल केले आणि फरार झाला.

