पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा प्रबोधन मंच ठरतोय परिवर्तनाचा केंद्रबिंदू

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण :“माणूस हा निसर्गाशी घट्ट जोडलेला आहे. आपण निसर्गाला देव मानतो, त्यातील प्रत्येक प्राणी, वनस्पती यांची पूजा करतो. जशी माणसात माणुसकी आवश्यक आहे, तशीच झाडांमधली ‘झाडूसकी’ जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हिरवा श्वास देणाऱ्या निसर्गाची आणि झाडांची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे प्रभावी प्रतिपादन राहुल निकम यांनी केले.पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशन आयोजित ‘महापुरुषांच्या जयंती’ कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विकास शिंदे यांनी आपल्या भाषणात फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले. “पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा हा मंच खऱ्या अर्थाने प्रबोधन करणारा मंच आहे. येथे सर्व महापुरुषांच्या जयंती एकाच व्यासपीठावर साजऱ्या केल्या जातात, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे. समता, शिक्षण आणि संविधानाचे मूल्य यांची शिकवण या मंचावरून दिली जाते. ही प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्रभर पोहोचावी,” असे ते म्हणाले.

यावेळी राहुल निकम यांना ‘साहित्य रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या काव्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमात विशेष रंगत आणली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश बनकर यांनी केले. त्यांनी फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत प्रबोधनाच्या कार्याची दिशा स्पष्ट केली.या कार्यक्रमास पाडेगाव परिसरातील शेकडो महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात

सामाजिक ऐक्य, पर्यावरण जागरूकता आणि विचारांची देवाणघेवाण यांचे सुंदर दर्शन घडले.पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा हा उपक्रम केवळ जयंती साजरी करण्यापुरता मर्यादित न राहता समाजमनात विचारांची पेरणी करणारा ठरत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

error: Content is protected !!