महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण : सस्तेवाडी गावातील महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून, गावातील अनेक ठिकाणी वाकलेले वीज पोल, लोंबणाऱ्या वीजवाहिन्या, उघडे ट्रान्सफॉर्मर बॉक्स आणि निकृष्ट देखभाल यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती अधिकच धोकादायक बनली असून, कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी महावितरण प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
गावातील विविध भागांमध्ये अनेक वीज पोल झुकलेल्या अवस्थेत असून, काही ठिकाणी वीजवाहिन्या इतक्या खाली लोंबकळत आहेत की त्या नागरिक, शेतकरी आणि जनावरांसाठीही धोक्याच्या ठरत आहेत. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना या मार्गाने प्रवास करताना सतत भीतीच्या वातावरणात वावरावे लागत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.याशिवाय अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचे बॉक्स उघडे असून, त्यावरील सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पावसाळ्यात अशा ठिकाणी विजेचा धक्का लागण्याची किंवा शॉर्टसर्किट होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्यांबाबत महावितरणच्या संबंधित शाखा कार्यालयाकडे अनेक वेळा तोंडी तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, केवळ पाहणी किंवा आश्वासने देण्यात आली असून प्रत्यक्षात आवश्यक दुरुस्तीची कामे झालेली नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांचा आणखी एक गंभीर आरोप म्हणजे दुरुस्ती व देखभालीसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च दाखवला जातो, देखभालीची बिले काढली जातात; परंतु प्रत्यक्षात गावातील वीज यंत्रणेत कोणताही लक्षणीय बदल दिसून येत नाही. त्यामुळे “दुरुस्ती आणि देखभाल केवळ कागदोपत्रीच होत आहे का?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
या खर्चाची स्वतंत्र चौकशी करून प्रत्यक्ष केलेल्या कामांचा तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणीही होत आहे.सध्या पावसाळ्याची सुरुवात होत असल्याने वाकलेले पोल कोसळण्याचा, लोंबणाऱ्या तारा तुटण्याचा किंवा उघड्या ट्रान्सफॉर्मरमधून विद्युत अपघात होण्याचा धोका अधिक वाढला आहे. अशा परिस्थितीत कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकारी आणि महावितरण प्रशासनावर राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
सस्तेवाडीतील नागरिकांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने गावाची प्रत्यक्ष पाहणी करून धोकादायक वीज पोल बदलावेत, लोंबणाऱ्या वीजवाहिन्या सुरक्षित उंचीवर कराव्यात, उघडे ट्रान्सफॉर्मर बॉक्स सुरक्षित करावेत आणि देखभाल कामांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या माध्यमातून तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

